अन्य राज्यातील मजुरांनी आणि परगावात राहणाऱ्या मराठी माणसांनी आहे तेथेच रहावे. त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्यास सरकारला मदत होईल.
आता येत्या काही दिवसांत कोरोनाची बाधितांची संख्या गुणाकार करू लागेल. मात्र, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचवेळी वेळेत उपचार घेणारे बरे होऊन घरीही परतत आहेत. तेव्हा चाचणी सुरू करण्या आधी परदेशातून आलेले मात्र तपासणी न झालेल्यांना जर कोरोनाची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी सरकरी रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी केले.
वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि पोलिस आपल्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ते आपल्या कुटुंबियांना सोडून तुमच्यासाठी लढत आहेत याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन करतानाच शिवभोजन केंद्राची वेळ दोन तासांवरून तीन तास करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले, हातावर पोट असणाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे, पण आपण हिंमतीने याचा सामना केल्यास या संकटाला आपण पराभूत करू शकतो, असा मला विश्वास आहे.
तसेच या संकट काळात राज्य सरकारच्या मदतीला धावून येणाऱ्या शिर्डी देवस्थान ट्रस्ट आणि सिध्दीविनायक ट्रस्टचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. घरी आनंदात सकारात्मक पध्दतीने वागून या संकटाला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले.

