भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना - प्रांताधिकारी सचिन इथापे
पंढरपूर : माघ यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून, हे कक्ष 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
माघ वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, नगरपालिका, पत्राशेड, , विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, तसेच मुख्य आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. भाविकांना काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
माघ यात्रा : वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज -उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले
*१ हजार ४८६ पोलीस अधिकारी व कर्मचारी, ६ ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र * २६० सीसीटीव्ही कॅमेरे, १३ वॉच टॉवर
पंढरपूर :- माघ शुद्ध जया एकादशी सोहळा आठ फेब्रुवारी रोजी असून, माघ यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी दिली.
माघ वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ४८६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ०२ पोलीस उपअधिक्षक, ७१ पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, ८०० पोलीस कर्मचारी व ६०० होमगार्ड तसेच दोन बीडीएस पथके नियुक्त करण्यात आले आहेत.
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड यासह आदी ठिकाणी १३ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापना करण्यात आली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरात व मंदिर, मंदिर परिसर , दर्शन रांग आधी ठिकाणी २६० सीसीटीव्ही कॅमेरॅच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी ६ ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी १३ ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर १५ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.भोसले यांनी केले आहे.



